Tuesday, December 25, 2012

किल्ले वासोटा



 वासोटा (Vasota) किल्ल्याची ऊंची :
4267
किल्ल्याचा प्रकार : वनदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर
कोयना
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
महाराष्ट्रातील,
कोयना नदीच्या खोर्य़ात, निबिड
अरण्यात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले
वासोटा’. ज्ञानेश्वरीत
वासोट्याचा अर्थ ’आश्रयस्थान’
असा दिला आहे. वासोट्यालाच
’व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात
हा गड येत असल्यामुळे हा भाग दुर्गम
बनलेला आहे, तसेच वन्यजीवनाने समृद्ध
बनला आहे..
Vasota
इतिहास :
वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध
घेता आपल्याला वसिष्ठ
ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल.
असे मानले जाते की, वसिष्ठ
ऋषींचा एक शिष्य,
अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत
ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला,
सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर
राहण्यास आला व त्याने
आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे
नाव दिले. कालांतराने
या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे
साज चढवून लष्करी ठाणे केले.
त्या डोंगराचे परंपरागत ’वसिष्ठ’ हे
नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा’ झाले.
प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही,
हा किल्ला शिलाहारकालीन
असावा.
शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत
’वसंतगड’ या नावाने
उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा.
मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीवरून
शिवरायांनी जावळी विजयानंतर
वासोटा घेतला असे सांगितले जाते, पण
ते खरे नाही जावळी घेताना,
जावळीतील तसेच कोकणातील इतर
किल्ले शिवरायांनी घेतले. पण
वासोटा दूर असल्याने
किल्लेदाराच्या हाती राहीला.
अफझल वधानंतर
काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत
नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडावर
अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत
मावळातील पायदळ पाठवून
त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून
१६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये
पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व
सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत
ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये
वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये
सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये
पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई
तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात
घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे
सेनापती बापू गोखले यांनी ताई
तेलिणी बरोबर लढाई केली. ताई
तेलिणीने आठदहा महिने प्रखर झुंज
देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये
वासोटा किल्ला बापू
गोखल्यांच्या हाती पडला.
पहाण्याची ठिकाणे :
वासोटा किल्ल्यावर
जाण्यासाठी दोन दरवाजे लागतात.
यातील
पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत
आहे. दुसर्य़ा दरवाजाने गडावर प्रवेश
करता येतो. समोरच मारुतीचं बिन
छपराचं मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख
तीन वाटा जातात. सरळ
जाणारी वाट किल्ल्यावरील
भग्नावशेषांकडे घेऊन जाते.
उजव्या बाजूस जाणारी वाट
’काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. वाटेतच
महादेवाचे सुंदर मंदिर लागते. मंदिरात
दोन ते तीन जणांची राहण्याची सोय
होऊ शकते. येथून पुढे जाणारी वाट
माचीवर घेऊन जाते.
या माचीला पाहून
लोहगडच्या विंचूकाट्याची आठवण येते.
या माचीलाच काळकाईचे ठाणे
म्हणतात. या माचीवरून
दिसणारा आजुबाजूचा घनदाट
झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव,
रसाळ, सुमार, महिपतगड,
कोयनेचा जलाशय हा संपूर्ण
देखावा मोठा रमणीय आहे.
मारुतीच्या देवळाच्या डावीकडे
जाणारी वाट आपल्याला जोड
टाक्यांपाशी घेऊन जाते.
या टाक्यातील
पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे
ही वाट जंगलात शिरते
आणि बाबुकड्यापाशी येऊन पोहोचते.
या कड्याचा आकार इंग्रजी ’यू’
अक्षरा सारखा आहे. याला पाहून
हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण
येते. समोरच उभा असणारा आणि आपले
लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच
‘जुना वासोटा’ होय.
जुना वासोटा
नव्या वासोट्याच्या बाबुकड्यावर उभे
राहिल्यावर समोरच
उभा असणारा डोंगर म्हणजे
जुना वासोटा. आता या गडावर
जाणारी वाट अस्तित्वात नाही.
तसेच पाण्याचाही तुटवडा आहे. घनदाट
झाडे व वन्यश्वापदेही असल्याने
सहसा येथे कोणी जात नाही.
पोहोचण्याच्या वाटा :
वासोटा किल्ल्यावर
जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत.
एक सातारामार्गे आणि दुसरा थेट
नागेश्वर मार्गे वासोट्याकडे
१) सातारामार्गे वासोटा :- खालील
तिनही मार्गाने जातांना प्रथम
कोयना धरणाचा " शिवसागर जलाशय
" बोटीने पार करावा लागतो.
अ) कुसापूर मार्गे :-
सातार्याहून
बामणोली या गावी यावे. सकाळी ९
वाजता सातार्याहून बसची सोय आहे.
येथून
कुसापूरला कोयना धरणाचा जलाशय
लाँचने पार करून जाता येते. कुसापूरहून
दाट जंगलात दोन वाटा जातात.
उजवीकडे जाणारी वाट आठ
मैलांवरील नागेश्वराकडे जाते. तर
डावीकडे जाणारी वाट वासोट्यावर
घेऊन जाते.
ब) खिरकंडी मार्गे:-
सातार्याहून बसने ’वाघाली देवाची’
या गावी यावे. येथून
लाँचच्या सहाय्याने जलाशय पार करून
खिरकंडी या गावी यावे. येथून धनगर
वाडी पासून जाणारी वाट ’मेट
इंदवली’ या गावात घेऊन जाते.
सातार्याहून इथवरचा प्रवास आठ- नऊ
तासांचा आहे. येथून पुढे पाच -
सहा तासात वासोट्यावर जाता येते.
क) महाबळेश्वर मार्गे :-
महाबळेश्वरहून ‘तापोळे’ गावी येऊन
लाँचने कुसापूर गाठता येते, आणि तेथून
(अ) मध्ये सांगितलेल्या रस्त्याने
वासोटा गाठावे.
२) चिपळूणहून वासोटा :-
ड) चिपळूणहून सकाळी ८.३०
वाजताच्या बसने ‘चोरवणे’
या गावी यावे. येथून ५ ते ६ तासात
वासोट्याला पोहोचता येते. या मार्गात
वाटेत कुठेच पाणी नसल्यामुळे
आपल्याकडे पाण्याचा भरपूर
साठा घेऊन जावे. या वाटेने वर गेल्यावर
एक पठार लागते. पठारावरून डावीकडे
जाणारी वाट नागेश्वरकडे तर
उजवीकडची वाट वासोट्याला जाते.
येथे नागेश्वराकडे जाणार्य़ा वाटेने थोडे
पुढे गेल्यावर खाली एक वाट जंगलात
विहिरीकडे जाते. येथून वासोट्याचे
अंतर दोन तासात कापता येते.
ई) चिपळूणहून ‘तिवरे’ या गावी यावे,
येथून रेडे घाटाने
वासोट्याला जाता येते.
फ) नागेश्वरमार्गे वासोटा :-
नागेश्वरला भेट दिल्याशिवाय
वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत
नाही. वासोट्यावर जाताना समोरच
एक सुळका आपले लक्ष वेधून घेतो,
त्यालाच नागेश्वर म्हणतात.
या सुळक्याच्या पोटात एक गुहा असून,
तेथे महादेवाचे मंदिर आहे.
हजारो नागरिक दर
शिवरात्रीला या पवित्र
स्थानी दर्शनास येतात.
गुहेच्या छतावरून बाराही महिने
पाण्याच्या थेंबांचा अभिषेक
शिवलिंगावर होत असतो. बहुतेक
ट्रेकर्स प्रथम नागेश्वराचे दर्शन घेऊन मग
वासोट्याला जातात. त्यासाठी फक्त
लांबचा पल्ला चालण्याची तयारी असावी लागते.
राहाण्याची सोय :
१)
पूर्वी उल्लेखिलेल्या नव्या वासोट्यावरील
महादेवाच्या मंदिरात २ ते ३
जणांची राहण्याची सोय होते.
२) नव्या वासोट्यावर जोड
टाक्यांच्या शेजारील
पठारावरही राहता येते.
३)
नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम
जागा आहे. येथे २० ते २५ जण आरामात
राहू शकतात.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वतच करावी
पाण्याची सोय :
नागेश्वराच्या गुहेकडे जातांना,
पायर्य़ांच्या उजवीकडून जंगलात
जाणारी वाट
पाण्याच्या विहीरीपाशी घेऊन
जाते. नव्या वासोट्यावरही मुबलक
प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.
उन्हाळ्यातही या विहिरीला पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
कुसापूर मार्गे ४ तास लागतात , चोरवणे
मार्गे ७ तास लागतात.
सूचना :
१) वासोट्याला पावसाळ्यात
जाताना जळवांचा मोठ्या प्रमाणावर
त्रास होतो, तेव्हा आवश्यक
ती काळजी घ्यावी,
२) चिपळूणहून चोरवणे मार्गे
वासोट्याला जाताना वाटेत
पाण्याची कुठेही सोय नाही,
तेव्हा पाण्याचा पुरेसा साठा जवळ
बाळगणे आवश्यक आहे,

No comments:

Post a Comment